शत्रुबुद्धि विनाशाय… (दिपावलीचा आजवर कधीही न ऐकलेला आशय) तुम्ही कधी कोणाशी कडकडून भांडला आहात का? म्हणजे लहानपणीच्या खेळातल्या भांडणापासून ते मोठेपणीच्या रस्त्यावरच्या भांडणापर्यंत कुठेही, कधीही, कोणत्याही कारणानं? अर्थातच भांडला असालच. कारण कधीच कोणाशीच कोणत्याही कारणानं न भांडलेली माणसं एकतर अत्यंत लेचिपेची, बुळी, दयनीय असतात किंवा अत्यंत महान आणि संतपदी वगैरे पोचलेली असतात. ही दोन्ही टोकाची माणसं सोडली तर, नॉर्मल माणसं भांडतात! सकारण, अकारण, विनाकारण, कोणत्याही कारणानं आणि कारण नसतानाही भांडतात. जिवलगांशी, नात्यातल्यांशी, शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी, ओळख असलेल्यांशी, अनोखळी माणसांशी, खऱ्या मित्रांशी, ऑनलाईन कनेक्शन्सशी, सगळ्या-सगळ्यांशी भांडतात. भांडणाला काहीही कारण पुरतं. नवऱ्यानं करपवलेलं दुधाचं पातेलं असो किंवा बायकोनं खारट केलेल्या बटाट्याच्या काचऱ्या. हट्टीपणा करणारे म्हातारे आई-बाप असोत किंवा होमवर्क न करणारा मुलगा. आपल्या पार्किंगमध्ये चुकून गाडी पार्क करणारा शेजारी असो किंवा सिग्नलला आपल्या मागे हॉर्न वाजवत उभा असणारा कोणी अनोळखी माणूस. आपल्या पोस्टवर टीका करणारा अनोळखी माणूस असो क...